शब्द म्हणजे कागदावर ओढलेल्या रेघोट्याच फक्त.
त्यामध्ये थोडीशी भावनांची शाई मिसळल्यावर बनते एखादी कविता.
आणि कवीचं कवीपण तेव्हाच ज्यावेळी त्याची कविता केवळ त्याची न राहता तिचा आस्वाद घेणाऱ्या रसिकांची होऊन जाते..
या ब्लॉगवरील माझी प्रत्येक कविता तुम्हांला तुमच्या जवळची वाटावी, एवढीच सरस्वती मातेच्या चरणी प्रार्थना..

Thursday 7 January 2016

कलंदर


सर्व वाटांतून आम्ही चाललो भटकत कधी
फार ओझे जड म्हणुनी दूर ते झटकत कधी
ना आम्हां चिंता टीकांची, ना उद्याची काळजी
वल्गनांना भीक आम्ही घातली नाही कधी

पाहुनी आम्हांस, अपयश जीव धरुनि धावते
कापते लटलट - जणू स्वर आर्जवाचा लावते
अंतराचे ऐकुनि, बाहेरचे दुखवत कधी
अपयशाला भीक आम्ही घातली नाही कधी

पर्वताला स्पर्शिता तो शिखर कापून ठेवतो
अन् निघाया पार त्याच्या वाट आम्हां दावतो
वेगळ्या धुंदीत त्याच्या सावल्या चुकवत कधी
अडथळ्यांना भीक आम्ही घातली नाही कधी 

वाहत्या वाऱ्यास आम्ही ह्या मुठीने रोखतो
तप्त अग्नीलाही आमची नजर टाकुन जाळतो
पोहुनि उलट्या प्रवाही, पूरही अडवत कधी
संकटांना भीक आम्ही घातली नाही कधी

जे जसे आयुष्य आले, ते न आम्ही लोटले
आमच्या नशिबासही आमच्या तऱ्हेने थाटले
तळपत्या ज्वाळा टीकांच्या फेकल्या विझवत कधी
प्राक्तनाला भीक आम्ही घातली नाही कधी 

No comments:

Post a Comment