शब्द म्हणजे कागदावर ओढलेल्या रेघोट्याच फक्त.
त्यामध्ये थोडीशी भावनांची शाई मिसळल्यावर बनते एखादी कविता.
आणि कवीचं कवीपण तेव्हाच ज्यावेळी त्याची कविता केवळ त्याची न राहता तिचा आस्वाद घेणाऱ्या रसिकांची होऊन जाते..
या ब्लॉगवरील माझी प्रत्येक कविता तुम्हांला तुमच्या जवळची वाटावी, एवढीच सरस्वती मातेच्या चरणी प्रार्थना..

Thursday 21 January 2016

युध्दसोहळा !!


रणात जातो, डंख मारतो, गर्व ठेवतो पंखांचा !
युद्धसोहळा संध्याकाळी घरात भरतो डासांचा !!

असा शूर प्रत्येक जीव तो निधडा होऊन लढत असे
अशी तयाची तीक्ष्ण नजर, सर्वत्र तयाला लक्ष्य दिसे
रक्त शोषणे धर्म तयाचा, अधीश तो तव वासांचा !!

म्हणे न कोणी तयास पक्षी, तरी असे उड्डाणपटू
असा चकवतो हात मानवी, जणू पावली इंद्रधनू
दिसे आपणा जरी, प्रयत्न व्यर्थ तया पकडायाचा !!

हार तयाला ठाऊक नाही, अलगद येतो जवळ जरा
समान देतो जगा वेदना, तोच असे निरपेक्ष खरा
असे शून्य उपयोग आपल्या धमक्यांचा नि धाकाचा !!

असे डास, बिनविरोध ज्यांना अधमाने निवडून दिले
रक्त शोषूनि छळणारे पृथ्वीवरही कलियुग आले
एक सांगणे - असा गुण आपल्या न असे उपयोगाचा

जरी चिरडती तयास सारे, ध्येय तयाचे एक असे
तयास ना भय मृत्यूचे अन् अन्य न कुठला नाद असे
एक शिकावे - ध्येयापुढती हट्ट नसावा श्वासांचा 

No comments:

Post a Comment