शब्द म्हणजे कागदावर ओढलेल्या रेघोट्याच फक्त.
त्यामध्ये थोडीशी भावनांची शाई मिसळल्यावर बनते एखादी कविता.
आणि कवीचं कवीपण तेव्हाच ज्यावेळी त्याची कविता केवळ त्याची न राहता तिचा आस्वाद घेणाऱ्या रसिकांची होऊन जाते..
या ब्लॉगवरील माझी प्रत्येक कविता तुम्हांला तुमच्या जवळची वाटावी, एवढीच सरस्वती मातेच्या चरणी प्रार्थना..

Thursday 22 June 2017

पंढरीची वारी in उद्योगनगरी 'पिंपरी चिंचवड'



राम कृष्ण हरी.. 
पंढरीच्या वारीबद्दल वारकऱ्यांच्या नेमक्या काय भावना आहेत? जाणून घेऊयात या व्हिडिओमधून !..

Friday 9 June 2017

किनारा



किनारा

किनाऱ्याला नसतो अंदाज
समुद्राच्या लांबी - रुंदी - खोलीचा
किनाऱ्याला नसते जाण
समुद्राच्या स्वच्छ - अस्वच्छपणाची
तो नाही  करत हिशोब
आल्या गेलेल्या नव्या जुन्या रेतीचा
त्याला नसते चिंता
समुद्राने निरंतर लादलेल्या
त्याच्या खारटपणाची
समुद्राच्या भरतीत तो बुडून जातो
आणि ओहोटीत मोकळा होतो
समुद्राला भेटायला येणाऱ्या प्रत्येकाचे
एखाद्या गृहलक्ष्मीप्रमाणे तो स्वागत करतो
एका मिठीपुरती का भेटेना,
पण प्रत्येक लाट त्याने कोरलेली असते आपल्या अंगावर
जिला निरोप देताना तो अक्षरशः
स्वतःमधले कण देऊ करतो !
आपण जातो मग त्याला सावरायला म्हणून
पण तो मात्र आणखीनच खोल धसत राहतो
घोंघावत राहतो वारा किनाऱ्याला समजावत
की या पाण्याचा खेळ चाललाय आभाळ होण्यासाठी
किनाराही म्हणतो, 'मला समुद्राचा नाद
यावी लाट, मग ती असो केवळ एका क्षणासाठी..'